Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीचा इतिहास व तिर्थक्षेत्राचे वैशिष्ट्ये श्रीक्षेत्र वैजनाथ बाराज्योर्तिलिंगापैकी एक वैद्यनाथचे काशीपेक्षा महत्व...आहे .काय इतिहास जाणून घ्या...!



     श्रीक्षेत्र परळी वैजनाथ बाराज्योर्तिलिंगापैकी एक वैद्यनाथ  आहे .येथे हिंदू धर्माचे प्राचीन पाच संप्रदाय परंपरेने आहेत आणि देव देवतेचा परिवार जणु माहेरघर असलेले पवित्र आणि पावन स्थान परळी होय.येथे १वैष्णव २शैव३शाक्त ४स्मार्त ५वैदिक संप्रदाय परंपरा आजतागायत जतन केलेले तीर्थक्षेत्र होय. .भारताच्या  नकाशात कन्याकुमारी ते उच्जैन दरम्यान एक मध्यरेषा ओढली तर ती परळी वैजनाथ क्षेत्रावरुन जाते .म्हणून परळीला मध्यरेखा पण म्हटले जाते.याविषयी एकमहान ज्योतिषाचार्य तथा गणितज्ञ
भास्कराचार्य[इ.स.११४४-१२२३]यांनी सिध्दांतशिरोमणी आणि करणकुतूहल हे ग्रंथ  लिहले आहेत.त्यांनी भारतवर्षाची मध्यरेखा कशी व कोणकोणत्या स्थानावरुन जाते हे वर्णित केलेले आहे.
"पुरीरक्षशां देवकन्याकथा कांची/सितःपर्वतःपर्यली वत्सगुल्यम//
पुरी चोज्जयिन्यांन्हया गर्गराटम/
कुरुक्षेत्र मेरुर्भुवोर्मध्य रेखा//"
भारताची मध्यरेखा राक्षसांचीनगरी लंका ,कन्याकुमारी,कांची,शैलपर्वतआणि परळीवरुन मेरुपर्वतावर जाते असा परळीचा स्पष्टपणे उल्लेख आलेला आहे .
महानुभवपंथाचे लीळाचरित्रग्रंथाचे उत्तरार्धात[शके१२०८]लीळा चरित्र उ.४९७,५१२ दोनवेळा परळीचा संदर्भ येतो.,"सोरठी सोमनाथुःआवंढा नागनाथुःपरळीए वैजनाथः" आणि ,"वैजाए परळीयेची वाणीन...वैजनाथाःधावं धावंः" असा संदर्भ येतो.
आनंदरामायणाचे ७व्या कांडातील विजय यात्रा प्रकरणात संदर्भ येतो."योगेश्वरी वरामंबा द्रष्ट्वा हि अंबापुरास्थिताम//७५//
वैजनाथं नमस्कृत्य वंजरा संगमंयथौ/नागेशंच विलोक्याय विमानेन स राघवः//
परळीतर प्रभुरामचंद्राचे पदस्पर्शाने पावन झालेली आहे.
महानुभवकवी डिंभ याने ज्योर्तिलिंगाची यादी दिली यात परळीचा उल्लेख आहे .याशिवाय वारकरी संत नरहरी सोनार यांनी ,"सत्यज्योर्तिलिंगे बारा.../नागनाथ अमृतोदकीं/विश्वजन केले सुखी/परळीवैजनाथसुखी/सुकृत साचे जन्माचे//" म्हटले आहे .
परळी या नगरीस प्रत्येक मन्वतरांत नानाविध नावे होती .स्वांयभुवमन्वतरात-उत्तमक्षेत्र,स्वारोचिषमन्वतरात-तिर्थराज,उत्तममन्वतरात- नारायणक्षेत्र,तामसमन्वतरात-ब्रम्हक्षेत्र,रैवतमन्वतरात-अमृतेश्वरक्षेत्र,चाक्षुषमन्वंतरात-वेदक्षेत्र,वैवस्वतमन्वतरात-प्रभाकरक्षेत्र   नावाने विख्यात   होय. प्रत्येक युगात सुप्रसिद्ध असलेल्या  परळीला  कृतयुगात-जयंतीक्षेत्र,त्रेतायुगात-वैजयंतीक्षेत्र,द्वापारयुगात-मध्यरेखा कांतीपुरी,कलीयुगात-परळीक्षेत्रास अशी नावे होती .

@परळी क्षेत्राचे वैशिष्ट्ये
-----------------------------
प्रत्येक तीर्थक्षेत्राचे आगळे वेगळे वैशिष्ट्ये असतात .पारंपारिक पध्दतीने पौराणिक ,धार्मिक ,ऐतिहासिक , सांस्कृतिक  आणि लोकपरंपरा व रुढींचा वारसा ,वाङ्मयीन संचिते जपत तीर्थक्षेत्रे पूनित झालेली आहेत.कोणत्याही तीर्थक्षेत्रास तीर्थ , पवित्र नदी ,ईश्वर आणि संत ,महात्मा ,साधू यांचे वास्तव्य असतेच .याचमुळे परळी वैजनाथ याज्योर्तिलिंग क्षेत्राची काही वैशिष्ट्ये आहेत ते खालील प्रमाणे होत.

(१)देव आणि आसुर यांनी समुद्रमंथन करुन चौदा रत्ने काढली .त्या समुद्रमंथनातून  अमृत कलशही  निघाला .तो दैवासूर संग्रामाचे वेळी धन्वतरीने परळी येथील ज्योतीर्लिंगात लपविला अशी  पौराणिक आख्यायिका  केवळ येथेच घडल्याचे वदंती आहे.

(२)वैद्यनाथ आणि धन्वंतरी हे दोघे ही आयुर्वेदाचे आचार्य तसेच  मुख्य आहेत.त्या दोन्हींचा या कथेशी सातत्याने उल्लेख येतोच.

(३)अमृतकूपी   नावाने याचे द्योतक म्हणूनच श्रीवैद्यनाथ मंदिराच्या पूर्वैस तीर्थ आहे .

(४)रसवैद्यकावर सैदमहंमद याने जो ग्रंथ लिहला तो आयुर्वेदीय ग्रंथ असुन वनस्पतींचे  अभ्यास केला व खरोसीकल्प तयार केला . तो लेखक परळीचा व परळीचे आजुबाजुचे गावाचे  संदर्भ दिलेले आहेत.

(५)ब्रम्हविणा घेतलेली काळ्यापाषाणाची देवर्षि नारदांची मूर्ती श्रीवैद्यनाथांचे पाठीमागे मंदिर प्रांगणात आहे.  हे एकमेवाद्वितिय मंदिर बारा ज्योर्तिलिंगापैकी फक्त परळी येथेच आढळून येते.

 (६)पौराणिक आख्यायिका म्हणून येथे वटसावित्री आणि सत्यवान यांची सांगितले जाते .वटसावित्री म्हणून  प्रशिध्द भाग आजही संबोधिले जाते . येथे च श्रियाळराजा चांगुणा हा चिलियाबाळासह राज्य करीत होते.व भगवान शंकराने सत्वपरिक्षा घेतली.राजा श्रियाळ व राणीचांगुणा,चिलयाबाळ यांच्या   सत्वशिलतेचे महिमान येथीलच होय.
,"एवढी परळी परळी/काशीपेक्षा न्यारी/
नांदतो वैद्यनाथ /श्रीयाळराजाची नगरी //"
असे म्हटले जाते.

(७)शैव आणि वैष्णव हा वाद परळीक्षेत्रात कधीही आजतागायत झालेला नाही .श्रीभगवान शंकर आणि श्रीभगवानविष्णू यांनी वैद्यनाथमंदिरालगत असलेल्या दक्षिणेकडील  तीर्थात  दोघांनी मनसोक्त जलक्रिडा केली म्हणून
हरिहरतीर्थ  हे नाव या तीर्थास पडलेले आहे

(८) वैकुंठचर्तुदशीचे दिवशी भगवान वैद्यनाथाचे शिवलिंगावर रात्री बारा वाजता तुळशीपत्र वाहिले जाते.हरिहरात्मक म्हणून पूजा केली जाते.

(९)भव्य श्रीविरभद्रमूर्ति वैद्यनाथाचे पूर्वदिशेस आहे.श्रीविरभद्र भगवान शिवाचा पूत्र होय.

(१०)बारा ज्योर्लिंगापैकी श्रीवैद्यनाथाचे मंदिर प्रांगणात इतर अकरा ज्योर्तिलिंग परिवार देवता म्हणून सभोवताली विराजित आहेत. इतर कुठल्याही ज्योतिर्लिंगाचे क्षेत्रात असे वैशिष्ट्ये आढळत नाही .

(११)भगवान वैद्यनाथचे पुढे तिन नंदी येथेच आढळतात .याचे कारण असे की भगवानवैद्यनाथ तिन्ही वेळी सकाळी ,दुपारी आणि सांयकाळी फिरताना ते नंदि सकाळी एकावर बसून ,दुपारी एकावर आणि सांयकाळी एका नंदिवर बसून फिरतात .
तेहतिस कोटी देवांचा राजा स्वतः येथील आख्यायिकेत सतत वावरत असल्यामुळे इंद्र देवतेचे नावाने नग नारायण पर्वतावर श्रीइंद्रेश्वर भगवान मंदिर आहे .

(१२)वैष्णवपीठ म्हणून येथे मूर्तीमंत गोपीनाथ वास्तव्यास आहेत.श्रीनारायणाने शतवैखानस ब्राम्हणांना परळीक्षेत्रातच राहा असा आदेश दिला असता तेव्हा शतवैखानसांनीही नारायणास विनंती केली की तुम्ही पण येथेच असावे.मग नारायणानाने मोहिनीरुप टाकून देऊन श्रीगोपीनाथ रुपाने वसति केली .अतिशय लावण्यमयी मूर्ती श्रीगोपीनाथाची येथे झुरळेगोपीनाथ नावाने सुप्रसिद्ध आहे.याशिवाय अंबेवेस मधील श्रीविठ्ठलमंदिर तसेच गणेशपार भागातील श्रीगोराराम ,सावळाराम मंदिरे आहेत.

(१३)वारकरीसंतमांदियाळीत सर्वश्रेष्ठ अग्रणी असलेले व संतज्ञानदेवादी संतनामदेव आदिंचे समकालीन संत श्रीजगमित्रनागा यांचे वास्तव्याने पावन झालेले परळीक्षेत्र होय.श्री नगनारायण पर्वताच्या उत्तरेस संतजगमित्रनागा समाधी असुन भव्य मंदिर आहे.

(१४)येथे भगवान दत्तात्रेयाचे मंदिर असुन दत्तात्रेयाचे अवतारी नृसिंहसरस्वती यांनी एकवर्ष  अनुष्ठान केलेचे सर्वश्रुत यामुळे दत्त उपासक येथे आढळतात.

(१५)परळी येथे गाणपत्य उपासकांकरिता  श्रीबोंबल्या गणपति,तसेच टिंबे गणपती ,गणेशपार  भागात प्रशिध्द गणपती  तसेच इतर विविध ठिकाणी गणेश मंदिर आहेत.

(१६)शाक्त संप्रदाय येथे बहुसंख्य असल्यामुळे नवदुर्गा रुपाने विविध मंदिरे आहेत १गिरीजामाता -श्रीवैद्यनाथाचे गाभाऱ्यात महाद्वारातच  सुंदर अप्रतिममूर्ति गिरिजादेवीरुपे आहे.
२कालरात्री-परळीच्या जुन्या भागात या  देवीचे भव्यदिव्य मंदिर आहे.
३अंबाआरोग्यभवानी-परळीचे दक्षिणेस चांदापूरगावाचे जवळ गोधूमाळ पर्वतावर डोंगरतुकाई या नावाने प्रशिध्दमंदिर होय.
४धनमनादेवी-ढोमणादेवी या नावे श्रीवैद्यनाथाचे उत्तरेकडील पायथ्याशी मोठ्या दगडशीळरुपाने आहे.
५श्रीकालिका-जुन्या असलेल्या ऊखळवेस भागात कालिकादेवी मंदिर आहे.
६अष्टभूजादेवी-तळपेठभागातील बुरुजात असलेली देवी होय .
७श्रीपद्मावतीदेवी-परळी येथील पद्मावतीगल्लीत देवी आहे.
८दुर्गादेवी-उखळवेसीतच कालरात्रीचे मार्गावर हि देवी आहे.
९भवानीमाता-भवानीचा मळा म्हणून प्रशिद्ध मळ्यातच या देवीचे मंदिर आहे.

(१७)श्री बटुक भैरव  मंदिर पूर्वैस आणि श्री क्षेत्र काशीचा हनुमान साक्षात परळीला चौकीदार म्हणून पश्चिमेस  आलेला आहे.

(१८)येथे हातात काठी -ओठात वेदपाठी  अशी ख्याती असलेले वैदिक मंत्रघोष करणारे म्हणून परळीक्षेत्र ख्यातिप्राप्त होते .म्हणून वैदिक संप्रदायिक लोकांची संख्या वेदपाठी,घनपाठी येथे होते.-हृस्व,दीर्घ ,अनुदात्त,उदात्त ,जटा,क्रम,ध्वज,शिखा,दंड, असे वैदिक परंपरेचा अभिमानी अनेक घराणे होती.

(१९)परळी तीर्थक्षेत्रात सरस्वती तसेच गणसिध्दिनावाची नदी वाहत आहे.नग नारायण पर्वत आहे .परळीत एकुण १०८तीर्थ होती.

(२०)परळी वैजनाथ मंदिर देवगिरीचे राजे यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री यांनी बांधलेले असून पूर्ण मंदिरे दगडी आहे फक्त या मंदिरास गारगोटी विट कुबेर मंदिराचे दक्षिणेस वैद्यनाथाचे जल निर्माल्याचे कुंडाचे वर आहे.हि गारगोटीची विट मंदिराची खूण आहे.

(२१)मंदिराचे प्रांगणात कुबेराचे मंदिर आहे.
अनेकविध वैशिष्टये असलेले या मंदिराचा जिर्णोध्दार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला.त्या धर्ममातेमुळे   हिंदू देवतांचे मंदिर व अस्मिता कायम राहिली .

 (संतवाङमयाचे संशोधक )