महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. कधी नव्हे एवढं मोठं यश एखाद्या आघाडीला या निवडणुकीत मिळाल्याचं पाहायला मिळालं.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळालेलं बहुमत आणि जागांचे आकडे पाहता, आगामी दोन-तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा आणि पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यामुळं रविवारचा दिवसही राजकीय घडामोडी आणि सत्ताधाऱ्यांच्या जल्लोषाचा असणार आहे.
महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मात्र सपशेल अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही मिळेल की नाही? अशी एकूण स्थिती निकालानंतर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला सत्ता मिळण्याची ही सलग तिसरी वेळ असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
लाडकी बहीण योजना या संपूर्ण निवडणुकीत गेमचेंजर ठरल्याचं विश्लेषण सगळ्याच स्तरांतून केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच धार्मिक ध्रुवीकरण हाही मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा होता असं सांगितलं जात आहे.
अनेक बड्या नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामनाही करावा लागला. तर काही नेत्यांना अगदी काठावर विजय मिळवण्यात यश आल्याचं पाहायला मिळालं.
Social Plugin