आपला ई पेपर
सोयाबीन प्रक्रिया केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय उभारणीच्या सुमारे 311 कोटींच्या उभारणीस प्रशासकीय मान्यता
तीनही शासकीय संस्था उभारणीचे शासन निर्णय जारी
मुंबई राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी 'बोले तैसा चाले' ही उक्ती खरी ठरवत बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यात कृषी विभागामार्फत तीन शासकीय संस्था उभारणीच्या निर्णयास आज प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
परळी वैद्यनाथ तालुक्यात सोयाबीन संशोधन, प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामास प्रशासकीय मान्यता आज देण्यात आली असून, या कामासाठी 24 कोटी 5 लाख इतक्या निधी खर्चास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. या अस्थापनेवर 15 पेक्ष्या अधिक पदांची नव्याने निर्मिती करण्यात येणार असून, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
परळी वैद्यनाथ तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय उभारणीच्या कामाच्या 154 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून, याद्वारे शासन स्तरावर सुमारे 100 पदांची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पहिले वहिले शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यासाठी सुमारे 132 कोटी 89 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकिय मान्यता देण्यात आली असून, याद्वारे सुमारे 50 पदांची निर्मिती होणार आहे. या तीनही शासकीय संस्थांच्या मान्यता व निधी उपलब्धी साठी धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
कृषी विभागाचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात या तीनही शासकीय संस्था उभारल्या जाव्यात, यासाठी जिल्ह्याबाहेरील अनेकांचा विरोध पत्करला. आज अखेरीस या तीनही शासकीय संस्थांच्या उभारणीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्याच्या प्रति विशेष प्रेम सिद्ध झाले आहे.
धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व सिद्ध झाल्यायानंतर जिल्ह्यात एका पाठी एक विकासकामांचा धडाका लावला आहे. बीड येथील कृषी भवन, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विंभागाच्या तीन शासकीय संस्था, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे वसतिगृहे, अशा अनेक कामांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी शेकडो कोटींचा निधी अवघ्या काही दिवसातच जिल्ह्यात आणला आहे.
0 टिप्पण्या