परळी / प्रतिनिधी
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज पार पडली. अनेक अडचणी समोर येत असतानाही फुलचंद कराड यांनी आवश्यक असलेले पुरावे जोडलेले असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद होण्याचा चर्चेला पूर्णविराम मिळाला. फुलचंद कराड यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याने आता कारखान्याची निवडणूक त्यांना विचारात घेतल्याशिवाय बिनविरोध निघणार नाही हे स्पष्ट झाल्याची चर्चा कारखाना परिक्षेत्रात जोरदारपणे चालू आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी स्वतः दोन जागेसाठी पांगरी गट व व्ही.जे.एन. टी. गटातून आपला अर्ज दाखल केलेला आहे. वेगवेगळ्या गटातून अर्ज भरत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सुद्धा त्यासोबत जोडली गेली होती. फुलचंद कराड यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमनताई कराड यांनीही महिला गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही उमेदवारी अर्जाची आज छाननी पार पडल्यानंतर दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविले आहे.
निवडणुकीचा कराड यांना मोठा अनुभव असून आवश्यक असलेली कागदपत्रे कशी जोडावी याचा अनुभव हा त्यांना पुन्हा कमी आला. काही मंडळींनी कराड यांचा अर्ज उमेदवारी बाद होईल असे भाकीत केले होते. परंतु असे काहीही न होता उलट पक्षी कराड यांचा अर्ज वैध ठरलेला आहे. दरम्यान आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फुलचंद कराड हे खऱ्या अर्थाने आवाज असून पुन्हा एकदा कारखान्यात आपला हक्काचा माणूस जाईल अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे.
कार्यकर्ते तसेच शेतकरी व कामगार वर्गात फुलचंद कराड यांच्या उमेदवारीचे जोरदारपणे स्वागत करण्यात आले आहे .साखर कारखान्याच्या उभारणीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे यांचा जेवढा सहभाग आहे तेवढेच योगदान फुलचंद कराड यांनीही दिले असून त्यांना विचारात घेतल्याशिवाय वैद्यनाथ ची निवडणूक पुढे जाईल असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांत व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या