Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली |धनंजय मुंडे

 


सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली |धनंजय मुंडे

अतिवृष्टी निकषात न बसलेल्या नुकसानीपोटी 9 जिल्ह्यांना 755 कोटींची मदत, बीड जिल्ह्याचा समावेश, पण मदत मात्र 17 लाख |धनंजय मुंडें

याआधीच्या मदतीतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत नाही, सांगा सरकार दिवाळी कशी करायची? - धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल


परळी  अतिवृष्टी व पावसाने शेती पिकांचे झालेले नुकसान त्याचबरोबर विविध कीड व रोगराईने शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यात राज्य सरकारने अतिवृष्टी निकषात बसत नसलेल्या परंतु नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज 755 कोटींची मदत जाहीर केली आहे, मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमधून केवळ 17 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. याआधीही अतिवृष्टी व गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांच्या नुकसानीची आकडेवारी पाहता नव्या राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा विक्रम केला असल्याची टीका माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी केली आहे. 


महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी निकषात न बसणाऱ्या परंतु पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज मदतीपोटी राज्य सरकारने 755 कोटी रुपयांची आर्थिक मदत शासन निर्णयाद्वारे घोषित केली आहे. या 9 जिल्ह्यांच्या यादीत बीड जिल्ह्याचाही समावेश आहे, मात्र 755 कोटींपैकी बीड जिल्ह्यातील 160 शेतकरी बाधित असल्याचे दाखवत केवळ 17 लाख रुपयांची मदत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या शासन निर्णयाद्वारे घोषित करण्यात आली असल्याने धनंजय मुंडे संताप व्यक्त केला आहे.


याआधीही राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसनापोटी 3500 कोटींचे पॅकेज घोषित केले, मात्र त्या पॅकेज मधून देखील बीड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आले, शेतकऱ्यांची बाजू मांडण्याऐवजी जिल्ह्यातील सरकारमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात त्या काळात नुकसान झालेच नाही, असा जावई शोध लावला. 


त्यांनतर सोयाबीन व अन्य नुकसान झालेल्या पिकांना संबंधित पीक विमा कंपनीने अग्रीम 25% मदत देण्याचा प्रस्ताव चर्चिला गेला, जिल्हा प्रशासनाने 63 पैकी बहुतांश महसुली मंडळांच्या पिकांना अग्रीम देण्याची अधिसूचना देखील संबंधित विमा कंपनीस दिली, मात्र विमा कंपनीने मुजोर भूमिका घेत अग्रीम मदत नाकारली. 


गोगलगायींनी नुकसान केलेल्या पिकांसाठी सरकारने तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 95 कोटी रुपये मदत घोषित केली, त्यातही बीड जिल्ह्यातील बाधित क्षेत्र कमी दाखवण्यात आले व केवळ 5 कोटी रुपये मदत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली. 


बीड जिल्ह्यातील शेतकरी सततच्या पावसाने व नुकसानीने त्रस्त आहेत, त्यातच सरकारने कधी निकषांच्या नावाने तर निकषांच्या बाहेर जाऊनही नुकसानच झाले नाही, असा सांगावा करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे, किंबहुना सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशा परिस्थितीत आमच्या शेतकरी बांधवांनी दिवाळी कशी साजरी करावी? असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या