मुंबई // दिल्लीमध्ये फडणवीस आणि अमित शाह यांची बैठकीबरोबरच शरद पवार आणि सोनिया गांधींचीही भेट होत आहे. भाजपची पुढची रणनीती या दोन्ही भेटींवर ठरेल, असं मत राजकीय चिञात दिसत आहे .
"शिवसेना ज्या मागण्या करत आहे, विशेषतः मुख्यमंत्रिपदाबाबत त्या मान्य करणं शक्य आहेत का, याची चाचपणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत होऊ शकते. जर शिवसेनेच्या मागण्या मान्य करायच्या नसतील तर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून (अपक्षांच्या मदतीने) सत्तास्थापनेचा दावा करू शकतो. सभागृहात बहुमत सिद्ध करेपर्यंत भाजपला वेळ मिळेल आणि त्याकाळात शिवसेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न होतील.
दुसरीकडे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर किती वाढणार, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधींच्या बैठकीत शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर नक्कीच वाढू शकते. अशावेळेस भाजपसमोर शिवसेनेच्या मागण्या पूर्ण करून त्यांना सोबत घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसेल."
हरयाणा-महाराष्ट्रातील निकालांमुळे भाजपचा अपेक्षाभंग झाला आहे. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं आहे. पण युतीच्या जागांमध्ये शिवसेनेच्या 56 जागांचा वाटा आहे. या निवडणुकीत नुकसान भाजपचं झालं आहे. त्यांच्या जागाही कमी झाल्या आहेत आणि अपक्षांना सोबत घेऊनही भाजपला सत्ता स्थापन करता येणं कठीण आहे.


Social Plugin