मुंबई दि. १५ ----------
देशात आणि राज्यात आज अप्रत्यक्ष आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीची चारही स्तंभ नव्हे तर संविधानही धोक्यात आले आहे. संविधान जाळण्यापर्यंत आज मजल गेली आहे. अशा प्रवृत्तीना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणातून का ठणकावले नाही ? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघातुन सलग तीन वेळा निवडून आलेले शिक्षक आमदार श्री. कपिल पाटील यांच्या नागरी सत्कारानिमित गोरेगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते, माजी खासदार नाना पटोले,गिरीष सामंत,पत्रकार युवराज मोहिते, शशांक राव उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मुंडे म्हणाले की देश आणि राज्यात अप्रत्यक्ष आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, आजची अराजकता पाहता आपणा सर्वांना निर्वाणीच्या लढाईला तयार राहावे लागणार आहे. केवळ संविधानाचे प्रेम दाखवून उपयोग होणार नाही तर त्याचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. सरकार विरोधी बोलणारा प्रत्येक आवाज दाबला जात असताना तो दबाव झुगारून देण्याचे काम श्री. नाना पटोले यांनी सर्वात प्रथम केले. आमदार कपिल पाटील हे स्वर्गीय मृणालताई गोरे यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे गौरोदगार श्री. मुंडे यांनी काढले.
श्री. नाना पटोले यांनी ही देशात आणीबाणी सुरू असल्याचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान कार्यालय अंबानीच्या इशाऱ्यावर चालते. अंबानी सांगतात त्याच फाईल क्लिअर केल्या जातात असा गौप्यस्फोट त्यांनी केला. कोणत्याच खासदाराला पंतप्रधानाशी बोलु दिले जात नाही. इतकेच नव्हे तर वयस्कर खासदार, महिला यांना अपमानित केले जाते असेही ते म्हणाले. आपण यापुढे राज्यातच काम करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
हा आपला सत्कार नसून स्व. मृणालताई गोरे यांचे विचार मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या एकत्रिकरणाची सुरवात असल्याचे श्री. कपिल पाटील म्हणाले. श्री. पाटील यांचा यावेळी फुले पगडी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार पंकज दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद सावला यांनी केले.
-----------------
Social Plugin