बीड// आई-वडिलांच्या भेटीसाठी पुण्याहून नांदेडकडे दुचाकीवरून निघालेल्या युवकाचा कड्याजवळ धानोरा येथे गाडीवरून पडून अपघाती मृत्यू ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली.
अविनाश देवराव दांगट (वय १९, रा. उमरी. ता.हदगांव, जि. नांदेड) असे त्या युवकाचे नाव आहे. रोजगारासाठी पुण्यात गेलेला अविनाश सध्या मोशी येथील एका बेकरीत काम करत होता. मागील पाच महिन्यापासून तो गावी गेला नव्हता. त्यामुळे आईवडिलांच्या भेटीसाठी शुक्रवारी दुपारी तो दुचाकीवरून (एमएच १४ एफएच ९३३४) गावाकडे उमरीला निघाला होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास कडा नगर रोडवरील धानोरा गावानजीक वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि तो दुचाकीसह रस्त्यावरून खाली पडला. या अपघातात गंभीर इजा झाल्याने अविनाशचा जागीच मृत्यू झाला. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
@ वळण ठरतेय मृत्यूचा सापळा
धानोरा गावानजीकचे हे वळण अतिशय धोकादायक असून याठिकाणी आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. याच वळणावर दीड वर्षापूर्वी खाजगी बसचा अपघात होऊन ११ लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या ठीकाणी संरक्षण भिंतीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच ठिकाणी शुक्रवारी पुन्हा एका युवकाचा बळी गेला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
Social Plugin