Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने ,पीकविम्याचे अवघ्या दहा हजारांसाठी वडिलांचा केला खून



धारूर // पीकविमा आणि इतर शेतकी अनुदानाचे खात्यावर जमा झालेली दहा हजारांची रक्कम देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून केला. दोन महिन्यापूर्वी धारूर तालुक्यात घडलेल्या या घटनेत बुधवारी मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आश्रुबा कारभारी मुंडे (वय ७४, रा. अशोक नगर, धारूर) असे मयत पित्याचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी डोक्याला मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरात पायऱ्या चढत असताना पाय घसरून पडून डोक्याला चॅनल गेट लागल्याने वडील जखमी झाल्याचे आश्रुबा यांचा मुलगा बलभीम याने त्यावेळी पोलिसांना सांगितले होते. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी आश्रुबा यांचा मृत्यू झाला. परंतु, मृतदेहावरील खुणा पाहून हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा असा संशय पोलिसांना आला. त्यादृष्टीने त्यांनी तपास केला असता आश्रुबा आणि बलभीम यांच्यात अनुदानाच्या रकमेवरून जोरदार वाद सुरु होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता बलभीम यानेच वडिलांचा खून केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सहा. फौजदार राजाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून बलभीमवर धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी बलभीमला बेड्या ठोकल्या असून गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक कुकलारे हे करत आहेत.

▪ अवघ्या दहा हजारांसाठी घेतला वडिलांचा बळी :
बलभीम हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. दरम्यान, त्याच्या वडिलांच्या खात्यावर पीकविमा आणि इतर शेतकी अनुदानाचे दहा हजार रुपये जमा झाले होते. ही रक्कम द्यावी म्हणून बलभीमने वडिलांकडे तगादा लावला होता. २१ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता बाप-लेकात पैश्यावरून जोरदार भांडण झाले. त्यावेळी चिडलेल्या बलभीमने लोखंडी पहार घेऊन वडिलांच्या डोक्यात पाठीमागील बाजूने मारली. वयोवृद्ध आश्रुबा हा वार सहन करू शकले नाहीत आणि खाली पडले. त्यानंतर घाबरलेल्या बलभीमने वडील पायऱ्यावरून पडून त्यांच्या डोक्याला चॅनल गेट लागल्याचा बनाव रचला. कुटुंबातील इतर सदस्यांनीही याप्रकरणी चुप्पी साधल्याने पोलीसांना तपास करणे अवघड झाले होते.

▪ डॉक्टरांचा अभिप्राय ठरला महत्वाचा :
घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडून अभिप्राय मागितला. घटनास्थळाची भेट आणि शवविच्छेदन यांच्या आधारे आश्रुबा यांच्या डोक्याला लागलेला मार पडल्याने लागल्याचा नसून त्यांच्या डोक्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने मारल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिला. या अभिप्रायानंतर पोलिसांना तपासाची निश्चित दिशा ठरविणे सोपे झाले.

▪ तत्कालील पोलीस निरीक्षक स्व. अनिलकुमार जाधव यांचे तपासात योगदान :
सुरुवातीस अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्याचा तपास सहा. राजाराम फौजदार जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे आणि धरुरचे तत्कालीन पोलीस निरिक्षक स्व. अनिलकुमार जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलीस निरीक्षक कुकलारे यांच्या सहकार्याने तपास करून खुनाचा छडा लावला. स्व. जाधव यांनी वेळोवेळी तपासात मोलाचे मार्गदर्शन केल्याचे राजाराम जाधव यांनी सांगितले.