परळी // प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आणि तहसील कार्यालयात करण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या शुभारंभनिमित्त आज परळी तहसील कार्यालयात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार, महसुलचे सर्व कर्मचारी आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमातून सर्वांशी संवाद साधला. याच कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले.
रविवारी सकाळी तहसील येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या संदर्भात इतंबूत माहिती दिली. शासनाचा प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी संतोष राठोड यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शाश्वत शेतीसंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले पारंपरिक शेतीपेक्षा आता गटशेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फळबाग लागवड आणि सेंद्रिय शेतीची कास धरणे आवश्यक असल्याचे मत मांडले.
प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना माहिती समजावून सांगण्यात आली.
Social Plugin