परळी// जायकवाडी धरणातील पाणी तातडीने खडका बंधा-यात सोडण्यासाठी शासन स्तरावर आपण हालचाली सुरू केल्या आहेत तथापि, भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी जायकवाडीचे पाणी 'लिफ्ट' पध्दतीने वाण धरणांत सोडण्यासाठी देखील आपण प्रयत्न करत असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले. मराठवाड्यात होत असलेल्या वाॅटरग्रीड चा फायदा या भागालाही मिळवून देऊ असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत २ कोटी ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, या भागात अत्यल्प पाऊस झाल्याने वाण धरण अद्यापही कोरडेच आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या खडका बंधारा उपयोगाचा आहे त्यामुळे तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जायकवाडीचे पाणी माजलगांव धरणात व तिथून खडका बंधा-यात सोडण्यात येईल. या शिवाय भविष्यात हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वाण व पोहनेर नदीवर बॅरेजेस बांधणे तसेच जायकवाडीचे पाणी लिफ्ट पध्दतीने वाण धरणांत सोडण्याचा आपला प्रयत्न आहे, हा भाग वाॅटरग्रीड प्रकल्पात समाविष्ट करू, यातील सर्व आवश्यक त्या कायदेशीर बाबींवर तोडगा काढू असे त्या म्हणाल्या.
Social Plugin