ना. पंकजाताईंचे सामाजिक कार्य गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच - मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
जनसेवेचा वसा शेवटच्या श्वास असेपर्यंत सोडणार नाही - ना. पंकजाताई मुंडे
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात आज सर्वधर्मीय ७९ वधू - वरांचे शुभविवाह मोठ्या थाटात पार पडले. जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी यावेळी सोन्याचे मनी मंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील तोतला मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता .सकाळी मुस्लिम समाजातील तीन तर दुपारी बौध्द धर्मातील वीस वधू वरांचे विवाह त्या त्या धर्मातील रितीरिवाजानुसार उत्साहात पार पडले. सायंकाळी गोरज मुहूर्तावर उर्वरित विवाह उत्साहात संपन्न झाले. या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अक्षयकुमार, श्रीमती प्रज्ञाताई मुंडे, मंत्री महादेव जानकर, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, गोविंदराव केंद्रे, प्रवीण घुगे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस
---------------------------
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कांही जण आयुष्यात केवळ राजकारणच करतात.मात्र मुंडे साहेबांनी आम्हाला समाजकारण करण्याचं शिकवले. त्यानुसार आम्ही वाटचाल करीत आहोत. परळी ही पवित्र भूमी असून शुभारंभ आणि सुरवात करण्याचं ठिकाण आहे, पण कांही मंडळी या भूमीचा उपयोग समारोपासाठी करतात, परळीत जेंव्हा सुरुवात होते तेंव्हा ते देशभर जाते. जे परळीत समारोप करतात त्यांचा समारोप झाल्या शिवाय राहत नाही असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. रचनात्मक जोड देत राजकारणा पलिकडे जाऊन सामाजिक काम करण्याची शिकवण आम्हाला दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेली आहे.राज्यात काम करताना हे सुत्र घेऊन राज्य सरकारने काम केले आहे. पंकजाताईच्या सामाजिक जाणिवाही गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच असल्याचा गौरव यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अभिनेता अक्षय कुमार यावेळी म्हणाले की, आजची बीड येथील गर्दी पाहता परळी छोटं गाव नसून परळी हे मोठं शहर आहे. एवढ्या मोठ्या एकत्र लग्नास आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित जनसुदायासमोर मी पहिल्यांदा आलो आहे. आपले वैवाहिक जीवन आनंदी व्हावे.सुख शांती लक्ष्मी यावी असेल असे वाटत असेल तर पत्नी आणि आईची काळजी घ्यावी .मराठी मला खूप चांगली वाटते. इकडे परळीत सामूहिक लग्नाचा दरवर्षी हा कार्यक्रम वर्षातून दोनदा आयोजित करावा असे आवाहन ही अभिनेता अक्षयकुमार यांनी यावेळी केले.
ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या की, सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा वाली व वाणी होण्याची शिकवण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेली आहे. या शिकवणी पासून श्वासात श्वास असेपर्यंत दूर जाणार नाही. मला मुलगा आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने कन्यादानाचे भाग्य मला लाभले याचा आनंद होत आहे. सामान्यांच्या सेवेचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात सदैव प्रामाणिक काम करत राहू. आपले प्रेम,आशिर्वाद, साथ व सहकार्य असू द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक खा. डाॅ.प्रीतम मुंडे यांनी केले.
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अक्षयकुमार यांचे शक्तीकुंज वसाहतीच्या मैदानावर हेलिकाॅप्टरने आगमन झाले. तिथे ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर एकाच गाडीतून ते कार्यक्रम स्थळी आले, तत्पूर्वी यशःश्री निवासस्थानी त्यांनी भेट दिली.
▪अभिनेता अक्षय कुमारने सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वधू वरांना एक लाख रूपये गिफ्ट चेक दिला. आपल्या पत्नी व आईच्या नांवाने ही रक्कम एफडी करा असे आवाहन त्यांनी केले.
• शहीद जवानांच्या मदतीसाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनानुसार 'भारत के वीर' अंतर्गत जमा झालेली एक कोटीचे धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
Social Plugin