वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकासाचा १२० कोटीचा आराखडा मंजूर
परळी //शहरातील गुंडगिरी संपविण्यासाठी व्यापारी व नागरिकांच्या मी पाठीशी आहे. समोरून येणारा वार अगोदर मी माझ्या खांद्यावर झेलेल, त्यामुळे येणाऱ्या काळात निर्भयपणे जगा, कुणाला घाबरू नका असा दृढ विश्वास देत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी स्वच्छ, सुंदर व भयमुक्त परळीच्या विकासाचे दायित्व घेतले. नगरपरिषदेत सत्ता नसली तरी शहराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत असे सांगून वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकासाचा १२० कोटीचा आराखडा मंजूर करून घेतला आहे. तुमची साथ आणि आर्शीवाद लाभल्यास भविष्यात या शहराचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.
शासनाच्या विशेष रस्ता अनुदानातील पांच कोटी रूपयांच्या अंतर्गत सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते काल मोठ्या थाटात पार पडला त्यावेळी उपस्थित हजारो नागरिकांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सलीम जहांगीर, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, अशोक जैन, डाॅ. शालिनी कराड, जीवराज ढाकणे, नामदेवराव आघाव, माऊली फड, शिवाजीराव गुट्टे, शिवसेनेचे नारायण सातपुते, भोजराज पालिवाल, रविंद्र परदेशी, रिपाइंचे नेते धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे आदी यावेळी उपस्थित होते.
परळी ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची व माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे, त्यामुळे इथल्या जनतेची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. मुंडे साहेबांनी शहराच्या भविष्याची दोरी माझ्या हातात दिली आहे, त्यामुळे इथे मला स्वच्छ, सुंदर व भयुमक्त वातावरण तयार करायचे आहे, मी तुमच्यासमोर केंव्हाही नतमस्तक आहे पण ज्या लोकांनी इथलं वातावरण गढूळ केलयं त्यांना साथ देण्याची चूक कधीही करू नका असे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.
विरोधकांचा विकास कामात खोडा
------------------------------------
रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुलभूत विकास निधी (२५१५), तीर्थक्षेत्र विकास आदींच्या माध्यमातून मी जिल्हयात तसेच ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला पण पालिकेत सत्ता नसल्याने या शहरासाठी कांही करता येत नाही ही खंत होती. मागील चार वर्षात शहरात विकास कामे करण्यासाठी मला परवानगी मिळत नव्हती, आज भूमिपूजन केलेले पांच कोटीचे रस्ते हे मुख्यमंत्र्यांना खास विनंती करून आणले आहेत, आणखी २५ कोटी रूपये मंजूर होत आहेत. यांत नगरपरिषदेचा कसलाही संबंध नाही असे सांगून येणारा काळ हा निवडणूकीचा आहे, विरोधक मला टार्गेट करतील पण त्यांच्या आरोपांकडे लक्ष न देता इथली गुंडगिरी व दहशत संपवून भयमुक्त परळी करण्यासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.
वारसा नेमका कोणाचा? हे एकदा ठरवा
---------------------------------
यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मी माझ्या वडिलांचे नांव लावते याचा अनेकांना त्रास होतो. एकीकडे मुंडे साहेबांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे त्यांचा अवमान करण्याचा काहीचा उद्योग बनला आहे. प्रत्येक वीस किमी. ला ज्यांचा वारसा बदलतो, ज्यांचे राजकारणच तोडपाणी करून होत आहे त्यांनी आपला वारसा नेमका कोणाचा? हे एकदा ठरवूनच घ्यावे अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला दमडीही आणता आली नाही. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे, इथला खडा सुध्दा मला विचारल्याशिवाय हलत नाही मग कुठल्याही कामाचे फुकटचे श्रेय कसे घेता असा खडा सवाल त्यांनी केला. तुम्ही केलेल्या पापाची क्षमा मुंडे साहेबांना हयात असतांना मागावी लागली, तुमच्यामुळं लोकं दूर गेली हे जनता अजून विसरली नाही असेही त्या म्हणाल्या.
राजकारणात मी कधी कुणाला त्रास दिला नाही पण माझ्या वाट्याला संघर्षच आला. माझ्या मनात जनतेविषयी खरी श्रध्दा आहे कारण इथल्या जनतेने मुंडे साहेबांना देशात उच्च स्थानावर नेऊन ठेवले होते. जनतेच्या सेवेसाठीच मी राजकारणात आहे, त्यामुळे एखाद्याच्या दहशतीला बळी पडून चांगल्या माणसाच्या पाठिशी राहण्याचे सोडू नका, परळीचे भविष्य घडवायचे असेल तर मला तुमची साथ आणि आर्शीवाद द्या असे आवाहन त्यांनी केले.
खा. डाॅ. प्रितमताई मुंडे
-----------------------------
यावेळी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनीही विरोधकांवर शरसंधान साधले. केवळ पंकजाताईंना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेते पद या भागात दिले आहे पण त्यांची डाळ जनताच शिजू देणार नाही असे त्या म्हणाल्या. राजकारणात कांही जणांना जनतेचा पैसा खाऊन स्वतःची भूक भागविण्याची सवय असते पण आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार असल्यामुळे आमची भूक मात्र जनतेची सेवा व त्यांच्या विकासाची आहे. ना. पंकजाताई यांच्यासारखे कणखर नेतृत्व जिल्हयाला मिळाले आहे, २५१५ हा निधी त्यांच्यामुळेच सर्वांना माहित झाला, जलयुक्त शिवार मधून त्यांनी व खासदार निधीतून मी या शहराला पाणी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
एवढा निधी आतापर्यंत कोणत्याही पालकमंत्र्यांनी आणला नाही - आ. धस*
----------------------------
ना. पंकजाताई हया 'ओरिजिनल गोपीनाथ मुंडे' आहेत, त्यांच्या एवढा निधी आतापर्यंत कोणत्याही पालकमंत्र्यांनी आणला नाही असे सांगून अशा कणखर नेत्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्यातच तुमचे भले आहे असे आ. धस म्हणाले.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वल्लभनगर, शिवाजीनगर, राठोड मेडिकल, कन्या शाळा रोड, पद्मावती गल्ली, गणेशपार आदी ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी भाजपच्या वतीने ना. पंकजाताई, खा. प्रितमताई व पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले तर अनंत मुंडे व बंडू आघाव यांनी संचलन करून आभार मानले. यावेळी शहरातील नागरिक, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••
Social Plugin