१० फेब्रुवारी रोजी साहित्यिक आबासाहेब वाघमारे अमृत महोत्सवी गौरव सोहळा !
आ. गणपतराव देशमुख, ना. पंकजा मुंडे, ना. धनंजय मुंडे यांच्यासह साहित्यिक इंद्रजित भालेराव, फ.म.शहाजिंदे यांची उपस्थिती_
परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आबासाहेब वाघमारे यांचा १० फेब्रुवारी रोजी अमृत महोत्सवी गौरव सोहळा आयोजीत करण्यात आला असून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.यावेळी आ. गणपतराव देशमुख, ना. पंकजा मुंडे, ना. धनंजय मुंडे यांच्यासह साहित्यिक इंद्रजित भालेराव, फ.म.शहाजिंदे व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
परळी नगरीचे भूषण व मराठी साहित्यात ज्यांचं आदरानं नाव घेतले जाते असे आबासाहेब वाघमारे यांचं हे ' अमृत महोत्सवी वर्ष 'आहे.या अमृत महोत्सवी वर्षा प्रीत्यर्थ त्यांचा १० फेब्रुवारी रोजी 'गौरव सोहळा'आयोजित करण्यात आला आहे. अमृत महोत्सव सोहळ्यासंबंधी विविध समित्यांचे कामकाज पूर्णत्वास गेले असून गौरवग्रंथ निर्मिती अंतिम टप्प्यात आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर येथे रविवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता गौरवसोहळा होणार असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधानसभेतील ज्येष्ठ आमदार गणपतराव आबा देशमुख भूषविणार आहेत.कार्यक्रमास राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे, राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव,ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक फ.म.शहाजिंदे , नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवरां सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.
परळी शहरातील हा सोहळा अतिशय सर्वसमावेशक, गौरवी व शानदार व्हावा या दृष्टीने समिती प्रयत्नशील आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन आबासाहेब वाघमारे अमृत महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पी.एस. घाडगे , स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, कार्याध्यक्ष राजेश देशमुख, कार्यवाह अरुण पवार, कोषाध्यक्ष विजय वाकेकर, गौरवग्रंथ समिती प्रमुख प्रा. डाॅ.राजकुमार यल्लावाड व सर्व पदाधिकारी, सदस्य आबासाहेब वाघमारे अमृत महोत्सव सोहळा समिती परळी वैजनाथ यांनी केले आहे.
●●●●●
*बहुआयामी निस्पृह 'आबा'.........!*
परळी शहरातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून साहित्य क्षेत्रात आबासाहेब वाघमारे यांची ओळख आहे. आबासाहेब वाघमारे यांचे साहित्य क्षेत्रात प्रचंड योगदान आहे. मराठी साहित्यात त्यांच्या समृद्ध साहित्याने मोठी भर घातली आहे. कथासंग्रह, काव्यसंग्रह, प्रौढ शिक्षण अभ्यासक्रम पुस्तिका, कथा, दीर्घकथा, नाटिका, हस्तपुस्तिका,आदी मराठीसह उर्दू भाषेतही प्रकाशित आहेत. विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब वाघमारे यांनी जीवनभर अविरत काम केले आहे. प्रति साने गुरुजी अशीच जणू त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी व विविध माध्यमातून सक्रिय काम करून एक उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक अशी त्यांची प्रतिमा आहे. नवोदित साहित्यिकांचे एक प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांनी काम केले आहे. आकाशवाणी, प्रौढ शिक्षण,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बाल वाचक लेखक मेळावा, परिसंवाद, नवथर साहित्य मंडळ , नाट्य चळवळ, वाचन चळवळ, अनिसं चळवळ आदी माध्यमातूनही त्यांनी साहित्यिक व वैज्ञानिक अभिरुची निर्माण करण्याचे काम सक्रियपणे केलेले आहे. सदोदित प्रेमळ, कार्यप्रेरक, प्रेरणास्त्रोत व निस्पृह साहित्यिक अशा विविध पैलूंनी नटलेल्या बाबासाहेब वाघमारे यांचे हे व्यक्तिमत्त्व परळीकरांसाठी भूषण आहे. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा गौरव होताना त्यांच्या जीवनातील असंख्य सहकारी विद्यार्थी साहित्य हे आत्मीयतेने सोहळ्याचे साक्षीदार होऊन स्वतःला धन्य करणार आहेत. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आबासाहेब वाघमारे अमृत महोत्सवी गौरव समितीने केले आहे.
Social Plugin